आमचा धक्का लागतो म्हणता, तर १७ जातींचा समावेश करून ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही का? मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर निशाणा
- श्री क्षेत्र नारायण गड, बीड येथे गर्दीचा उच्चांक
- आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार
- राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी दिला इशारा
- आपल्यावर अन्याय करणार असतील तर त्यांना उखडून फेकावेच लागेल
लोकमान्य टाइम्स : बीड
एकजण म्हणाला महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, मगच आरक्षण देतो ; आता १७ जाती घालताना तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतले का? अशी विचारणा करत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण आणि आंदोलन केलं. मात्र, अद्याप राज्य सरकारने त्यांच्या मागणीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. यातच आता दसऱ्यानिमित्त मनोज जरांगे पाटील यांचा श्री क्षेत्र नारायण गड, बीड येथे दसरा मेळावा पार पडला.
आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार
या दसरा मेळाव्यासाठी लाखो मराठा बांधव नारायण गडावर आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचा हा मेळावा महत्वाचा मानला जात आहे. या मेळाव्यातून मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. “आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार”, असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केलं आहे.
…आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का ?
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसींमध्ये आधीच भरपूर असल्याने तुम्ही येऊ नका म्हणता ; मग तुम्ही काल मोठ्या १७ जाती आरक्षणात घातल्या, आता तुमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का? अशी विचारणा त्यांनी केली. एकजण म्हणाला महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, मगच आरक्षण देतो. आता ओ. बी. सीमध्ये १७ जाती घालताना तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतले का? अशी विचारणा करत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
आचारसंहिता लागेपर्यंत धीर धरायचा आहे
ते म्हणाले की, आचारसंहिता लागल्यानंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका सांगणार आहे. आचारसंहिता लागेपर्यंत धीर धरायचा आहे. सरकारला सांगतो की आता सुट्टी नाही. आचारसंहिता लागल्यानंतर तुम्ही सर्वांनी ऐकायचं. ते काय करतात हे सगळं पाहायचं. त्यांनी सगळं केल्याशिवाय आपण निर्णय घ्यायचा नाही. त्यांनी सगळं केल्यावर आपण निर्णय घ्यायचा. तुमच्या मनात जे आहे, ती ईच्छा पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे. तुमची शान मी वाढवणारच आहे.
तर समोरच्यांना उखडून फेकावंच लागणार आहे
त्यांनी सांगितले की, क्षत्रिय मराठ्यांना लढायचं शिकवलं आहे. आल्यासमोर अन्याय करणारे असतील तर समोरच्यांना उखडून फेकावंच लागणार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. सगळ्या जातींसाठी लढणारा हा समाज आहे.