पिंपरी चिंचवड

नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा हा नागरिकांचा हक्क

  • महापौर रवि लांडगे यांनी  दिली निगडी व चिखली जलशुद्धीकरण केंद्राला भेट 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना भविष्यातही नियमित, पुरेशा दाबाने आणि स्वच्छ पाणीपुरवठा हा शहरवासियांचा हक्क आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याची गरज आहे.  त्यासाठी अधिकाधिक दर्जेदार उपाययोजना राबविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत नवनिर्वाचित महापौर रवी बाबासाहेब लांडगे व्यक्त केले.  

——————————-

शुक्रवारी (दिनांक ०६) महापौर पदाचा कारभार हातात घेतल्यानंतर शहरवासियांना दररोज पाणी पुरवठा करण्याचे अभिवचन दिले आहे. त्याअनुषंगाने रवी लांडगे यांनी शनिवारी (दिनांक ०७) सेक्टर नंबर २३ निगडी आणि चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राना भेट देत प्रत्यक्षात पाहणी केली.   

शहराला लागणारी एकूण पाण्याची गरज, महापालिकेच्या वतीने सध्या करण्यात येणारा पाणीपुरवठा, तसेच भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता राबविण्यात येत असलेल्या व प्रस्तावित उपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.यावेळी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, चीफ केमिस्ट डॉ. प्रशांत जगताप, कार्यकारी अभियंता विजयसिंग भोसले, महेश बरीदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

————————–

चिखली परिसरासाठी सध्या इंद्रायणी नदीवरील निगोजे बंधाऱ्यातून दररोज ९० एमएलडी पाणी घेण्यात येते. हे पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून परिसरातील नागरिकांना वितरित करण्यात येते. याशिवाय भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता भामा आसखेड धरणातून येणाऱ्या पाण्यासाठी २०० एमएलडी क्षमतेचा स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. 

————————-

याबाबत महापौर  लांडगे यांनी पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. तसेच निगोजे येथील सध्याची पंपिंग व्यवस्था ही आंद्रा धरणातून थेट जलवाहिनी कार्यान्वित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यात येत आहे, याबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला. यानंतर निगडी येथील सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राची त्यांनी पाहणी केली. यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे त्यांनी केंद्राबाबत सविस्तर आढावा घेतला.  हे जलशुद्धीकरण केंद्र सुरुवातीला ११४ एमएलडी क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले होते. 

———————————–

मात्र शहराचा विस्तार, नवीन निवासी व औद्योगिक क्षेत्रांची वाढ आणि पाण्याच्या मागणीत झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेता या केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला आहे. सध्या हे केंद्र ५५० एमएलडी क्षमतेने कार्यरत असून पवना नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून तसेच पंपिंग व्यवस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सुमारे ७५ टक्के क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया, गुणवत्ता तपासणीचे निकष आणि वितरण व्यवस्थेची माहितीही यावेळी  त्यांना देण्यात आली.

————————————–

या पाहणीदरम्यान भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, पाणी उचल, शुद्धीकरण व वितरणाची साखळी, पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी प्रक्रिया तसेच शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्यांची क्षमता व स्थिती याबाबत मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे व सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी माहिती दिली. 

————————————–