आषाढी वारीनिमित पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसवर काळाचा घाला ; ५ भाविकांचा जागीच मृत्यू तर अनेकजण जखमी
- बस समोर ट्रॅक्टर आल्याने बस ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले
- बस २० फूट दरीत कोसळली
- बस मध्ये एकूण ५४ भाविकांचा समावेश
- काही जणांची प्रकृती चिंताजनक
- जखमी भाविकांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू
लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन
आषाढीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसवर काळाने झडप घातली आहे. मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या बसचा पनवेलजवळ रात्री भीषण अपघात झाला आहे. यात ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत.
दरम्यान मुंबईहून सोमवारी रात्री बस पनवेल हद्दीत आली असता, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अचानक बससमोर एक ट्रॅक्टर आला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. बसमध्ये ५४ प्रवाशी होते यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघातासंदर्भात नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले की, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर अपघात झाला. एका बस मधून ५४ जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. त्यानंतर बस दरीत पडली. अपघातात जखमी झालेल्या ४२ जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर ०३ जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली येथील ५४ प्रवाशांना घेऊन एक बस मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. बससमोर एक ट्रॅक्टर आला आणि हा अपघात झाला. यावेळी ट्रॅव्हल्समध्ये असणाऱ्या भविकापैकी ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. यानंतर जवळपास ३ तास वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, मदत कार्य पूर्ण झाल्यावर पुण्याकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.