महाराष्ट्रराजकीय

आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील : मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

  • विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार ; या निवडणुकीत सत्ता पालट होणार
  • आम्हाला राजकारणात उतरायचे नाही
  • सरकारने आता आरक्षण न दिल्यास दुसरा पर्याय नाही

लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन

विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे. आम्हाला राजकारणात उतरायचे नाही. मात्र सरकारने आता आरक्षण न दिल्यास दुसरा पर्याय नाही. आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. तसेच राज्यभरातील मराठा समाजाच्या आमदारांनी सरकारला समजावून सांगावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मराठा समाजाने संयम धरला आहे; मात्र काही लोकांकडून समाजाला उचकाविण्याचा प्रयत्न सुरू आहे

ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले सध्या मराठा समाजाचे आंदोलन सुरू नाही. समाजाने संयम धरला पाहिजे. सध्या काही लोकांकडून समाजाला उचकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व जण स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी माझ्यावर तुटून पडले आहेत. मग ते भुजबळ यांच्यासारखे ओबीसी नेते असो किंवा भाजपचे मराठा आमदार, हे सर्व षडयंत्र आहे. आंदोलन करायला लावण्यासाठी हे एक षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी मनोज जरांगे यांनी केला.

कोणी काहीही बोलले तरी समाजाने आंदोलन करण्याची गरज नाही

पुढे जरांगे म्हणाले, कारण नसताना वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणी काहीही बोलले तरी समाजाने आंदोलन करण्याची गरज नाही. ज्या दिवशी जाब विचारायचा असे वाटेल त्या दिवशी सामाज काय करतो हे बघा असे म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. तसेच येणाऱ्या विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे असेही ते म्हणाले.

सरकारला ही शेवटची संधी ; आरक्षण देण्याचे केंद्र सत्ता आहे

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राज्यातील मराठा आमदारांची बैठक झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले, सगळ्याच पक्षातील मराठ्यांच्या आमदारांनी सरकारला समजावून सांगवे. आम्हाला राजकारणात जायचे नाही. त्यात आम्हाला ढकलू नका. ही सरकारला शेवटची संधी आहे. कारण आरक्षण देण्याचे केंद्र सत्ता असते. सध्या सत्ता त्यांची आहे. आम्हाला आरक्षण दिले नाही तर आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. २९ तारखेला याबाबत निर्णय होईल. मराठा समाजाला हीच राजकारणाला पायाखाली तुडवायची योग्य वेळ आहे असे वाटले तर निर्णय होईलच. कारण आमचाही नाईलाज असेल”, असे जरांगे म्हणाले.

मराठा समाजाने आता ताकदीने एकत्र यावे

यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला ताकदीने एकत्र येण्याचे आवाहन देखील केले आहे. ते म्हणाले, सध्या चारही बाजूने सरकारने आणि सत्ताधारी भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांनी मला उघडे पाडण्याचा प्रयत्न केल्याचे समाजाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांतील समाज ताकदीने एकत्र झाला आहे. आता रॅलीतून सरकारला समाजाची ताकद दिसणार आहे. मराठा समाजाला आवाहन आहे सर्वांनी एक दिवस प्रत्येक जिल्ह्यातील रॅलीत सहभागी व्हा, एक दिवस दिला तर समाजाचे कल्याण होणार आहे. ज्या ज्या जिल्ह्यांत या रॅली आहेत तिथे सर्व मराठा समाजाने एकजुटीने यायचे आहे असे आवाहन जरांगे यांनी यावेळी केले.