महाराष्ट्रराजकीय

राज्यपाल नियुक्त आमदारपदी चित्र वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग राठोड, हेमंत पाटील, मनीषा कायंदे, पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांच्या नावाची शिफारस

  • आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर घाईतघाई करून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे केली ०७ नावांची शिफारस
  • सात नावात भाजप (०३), शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी (०२) जागा
  • विविध क्षेत्रातील मान्यवरांची नावे अपेक्षित असताना राजकीय व्यक्तींच्या शिफारसी
  • राष्ट्रवादी काँग्रेसने दिली पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना संधी
  • बारा पैकी पाच जागा ठेवल्या राखून
  • नेत्यांच्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांना संधी
  • इतर इच्छुकांना पाच जागेचे आमिष दाखवून ठेवले झुलत
  • जयंत पाटील यांना जिल्ह्यातच रोखण्याची खेळी महायुती व अजित पवार यांच्याकडून केली जात असल्याची चर्चा

लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे करण्यात आली आहे. यात भाजपचे तीन, तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या प्रत्येकी दोन नावांचा समावेश आहे. राज्यपालांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित असताना राजकीय नेत्यांचीच वर्णी लावली जात असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य सरकारने घाईघाईने निर्णय घेत राज्यपालांकडे शिफारस केली. यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी येथील धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांची नावे देण्यात आली आहेत. शिंदे गटाच्या कोट्यातून माजी खासदार हेमंत पाटील आणि  प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे तर अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवडी यांची वर्णी लावण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी मिळाल्यावर घाईने राज्यपालांच्या मान्यतेसाठी फाईल पाठविण्यात आली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत नियुक्तीचे आदेश काढण्यात आले नव्हते. १२ पैकी पाच जागा अद्याप ठेवण्यात आल्या आहेत. या जागांसाठी इच्छुकांना आशेवर झुलवत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

नेत्यांच्या मर्जितीलच पदाधिकारी यांना संधी

राज्यपाल नियुक्त १२ जागेवर विविध क्षेत्रातील मान्यवर यांना संधी देणे अपेक्षित होते ; परंतु येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आपल्या मर्जीतील पदाधिकारी किंवा त्यांच्या नातेवाईक यांनाच विधान परिषदेवर निवड करण्याच्या दृष्टीने महायुतीतील प्रमुख नेत्यांनी नावांची शिफारस केल्याचे दिसत आहे. त्यामध्ये भाजप चे तिन्ही शिफारस केलेले आहेत त्यापैकी दोन नावे ही आजही महाराष्ट्राच्या पक्ष संघटनेच्या मुख्य पदावर विराजमान आहेत.तर एक नाव हे लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी गडाचे धर्मगुरू यांचे आहे ; शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली हे माजी खासदार आहेत तसेच त्यांच्या पत्नी यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. तर दुसऱ्या नावाची शिफारस केले आहेत त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. तर राष्ट्रवादीकडून माजी आमदार असणारे आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र म्हणून त्यांना संधी देण्यात आली आहे. मिरज सांगलीचे राष्ट्रवादीकडून शिफारस केलेले हे माजी महापौर असून मुस्लिम समाजातील एक बडे प्रस्थ आहेत.

अजिदादांनी घातले जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात लक्ष

इद्रिस नायकवडी यांना राज्यपाल नियुक्त आमदार पदी वर्णी लावून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डिवचण्याच प्रयत्न केला आहे. जयंत पाटील हे ही राज्यासह पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात खेचण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील यांच्या विरोधात जे गट सक्रिय आहेत त्यांना अजितदादा ताकद देताना दिसत आहेत. त्यात मुस्लिम मतदान डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या समाजातील एक प्रतिनिधी म्हणून नायकवडी यांना संधी देण्यात आल्याची ही चर्चा आहे. त्यात जयंत पाटील नेतृत्व करीत असलेल्या इस्लामपूर विधानसभा मतदार संघात जुन्या सांगली मतदार संघातील बराचसा भाग नव्याने जोडला आहे, तसेच या भागात मुस्लिम मतची टक्केवारी ही मोठी असल्याने जयंत पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात रोखण्याची खेळी महायुती व त्यामाध्यमातून अजितदादा हे खेळत असल्याची चर्चा राज्यासह सांगली जिल्ह्यात वाढली आहे.