पडळकरांच्या बेताल वक्तव्याबाबत शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन
- कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल विधान करणं योग्य नाही
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आमदार पडळकर यांना समज
- जयंत पाटील यांच्यावर बेताल व्यक्तव्याबाबत पडळकरांच्यावर सर्वच क्षेत्रातून टीकासत्र
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी सांगली दौऱ्यावर असताना शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांवर गलिच्छ शब्दात टीका केल्यानंतर महायुतीतील घटक पक्षासह विरोधी पक्षांकडून पडळकर यांच्या बेताल वक्तव्यावर टीका होत आहे. त्यात स्वतः शरद पवार यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करत पडळकर यांच्या वक्तव्याची तक्रार केली असल्याच्या गोष्टीला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे.
माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी पडळकर यांच्या विधानावर भाष्य केले. गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केलंय ते योग्य आहे, असं माझंही मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल विधान करणं योग्य नाही. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे. त्यांनाही मी सांगितलं असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.तसेच, मला शरद पवारांचा फोन आला होता. मीही त्यांना सांगितलं, अशा प्रकारच्या विधानाचं आम्हीही कधीच समर्थन करणार नाही, अस सांगितले आहे.
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते?
जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे, अशी पातळी सोडून टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. जयंत पाटलांनी मला एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. याने महाराष्ट्र कसा चालवला, जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. फंडाबाबत आमदार पत्र देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त आमदाराचा आणि कंत्राटदाराचा काही संबंध येत नाही.
जयंत पाटलाचे काम फक्त गोपीचंद पडळकरला बदनाम करण्याचं आहे. पण मी काय आता आलोय का? असे अनेक अंगावर घेऊन आलोय. या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन-दोन महिने मी जेलमध्ये जाऊन आलोय. जतमध्ये जयंत पाटलांनी माणसे पाठवली. गोपीचंद पडळकरांनी कोणत्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का याची माहिती घेतली. जर मी कुणाकडून पैसे घेतले असतील तर खंडणीचा गुन्हा दाखल करता येतो का पाहिलं. पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे, असं विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं.

