बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं; एक्स हँडलवर राज ठाकरे यांनी पोस्ट करीत सरकारचे टोचले कान

  • अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत ; राज्य सरकारने तातडीने पंचनामे करावेत
  • हे दुःख सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्याला पचविणे अशक्य आहे
  • नुकसान भरपाईचाही रक्कम जितक्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर देण्याचे राज ठाकरे यांचे आवाहन
  • मराठवाड्यातील शेतीचे पंचनामे तातडीने होत आहेत की नाहीत ते पाहण्याचे मनसैनिकांना दिले आदेश

लोकमान्य टाइम्स : मुंबई

सस्नेह जय महाराष्ट्र,

गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे.

राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं असे एक्स हँडलवर पोस्ट करीत राज्य सरकार चे महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कान टोचले आहेत. तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं.

यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे .

किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल असा टोला ठाकरे यांनी लागविला आहे. या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं असे राज ठाकरे यांनी सरकारला सुचविले आहे.