महाराष्ट्राच्या विकासाचा टक्का घसरला; महिला असुरक्षित; भाजप चे लक्ष फक्त सत्ता केंद्रीकरण : शरद पवारांचा भोसरीतील रेकॉर्ड ब्रेक सभेत महायुतीवर निशाणा
- लोकसभा निवडणुकीत लोकशाहीने दिलेल्या अधिकारावर घाला घालण्याचा डाव असणाऱ्या मोदी सरकारला महाराष्ट्राने रोखले
- विधानसभा निवडणुकीत ही सत्ता केंद्रीकरण धोरणाला दूर ठेवा
- शरद पवारांचे मतदारांना आवाहन
- शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव निश्चित करणार
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
भारतीय जनता पक्षाचे लक्ष हे फक्त सत्ता केंद्रीकरण याकडेच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा टक्का घसरला, राज्यात महिला असुरक्षित झाल्या आहेत. उत्तम शिक्षण घेऊन ही तरुणाच्या हाताला काम मिळत नाही, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. त्याच्या शेतीतील उत्पन्नाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. महायुतीच्या काळात विकासाचा टक्का घसरला आहे तो वाढवून देशात पुन्हा महाराष्ट्राला नंबर एकचे राज्य करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी भोसरी येथे महाविकस आघाडीचे उमेदवार अजित दामोदर गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आयोजित रेकॉर्ड ब्रेक जाहीर सभेत मतदारांना केले.
भोसरी येथील गाव जत्रा मैदान येथे सभा पार पडली. या वेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, माजी आमदार विलास लांडे, जयदेव गायकवाड, ज्येष्ठ नेते माजी महापौर आझम पानसरे, माजी महापौर शिवसेनेचे संजोग वाघेरे, माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, पिंपरी विधानसभेच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत, काँग्रेस शहराध्यक्ष अध्यक्ष कैलास कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, सुलभा उबाळे, रवी लांडगे , आपचे चेतन बेंद्रे, मानव कांबळे, यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटका पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपा व इतर संघटना आणि पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
खासदार शरद पवार म्हणाले की, ८४ वय झालं हे काढू नका, नाही तर आपले भांडण होईल असा चिमटा पुणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर यांना काढला. दिवंगत यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना उद्योग नगरी उभारताना त्यांनी पुण्याची निवड केली. जेआरडी टाटा यांना सांगून पिंपरीत उद्योग उभा केला. बजाज यांना सांगून इथ कंपनी उभ्या केल्या. माझ्या काळात मी हा उद्योग व्यवसाय वाढवा यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचे रूप बदलले. हिंजवडी मध्ये श्री संत तुकाराम सहकरी साखर कारखाना उभा राहणार होता. तिथे मी मुख्यमंत्री म्हणून नारळ फोडण्यासाठी गेलो असता येथे मला आय टी पार्क उभा करायचे आहे; तुम्हाला जवळच त्या बदल्यात जागा देतो असे सांगितल्यावर नाना नवले यांनी त्याला संमती दिली.
त्यामुळे हिंजवडी येथे आय टी पार्क उभा झाला. आणि आज तेथे लाखो लोक काम करत आहेत. चाकण, जेजुरी, रांजणगाव, शिरवळ येथे एमआयडीसी आणली. पूर्वीची ही स्थिती पुन्हा निर्माण करण्याचा विचार आहे. राज्यात भाजपची सत्ता होती. त्यांनी विकास करण्यासाठी सत्ता वापरली नाही. त्यांनी फक्त सत्ता केंद्रित करण्यावर भर दिला. केंद्रित सत्तेमुळे सत्ता भ्रष्ट होते. तेच काम भाजपने केले. अशा भाजपच्या सरकारला या वेळी मत द्यायचे नाही असा निर्धार करू.
येथील लोकप्रतिनिधी यांचे हिंदुत्व प्रेम बेगडी आहे : अजित गव्हाणे
अजित गव्हाणे म्हणाले की, येथील लोकप्रतिनिधी यांनी मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला. त्यामुळे त्यांचे हिंदुत्व प्रेम हे बेगडी आहे. एकमेकांचा आदर करायचा असे विविध धर्म शिकवतो. मात्र इथले प्रतिनिधी भांडण लावत आहे. संतपिठात वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणे अपेक्षित आहे. परंतु येथे सीबीएसई स्कूल सुरू केली. ३५ हजार रुपये प्रवेशासाठी घेतले जातात. आमचा या स्कूलला विरोध नाही.
परंतु ज्या उद्दात हेतूसाठी हे संतपिठ सुरू केले आहे त्याला मात्र या लोकप्रतिनिधींकडून हाडताळ फसला जात आहे. संविधान भवन कागदावर आहे. इथ कारखानदारी, उद्योग, रोजगार शरद पवारांनी आणले. त्याला इथल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची साथ मिळाली. शहरात तीनही आमदार झाल्यास २४ तास पाणी देऊ, वाहतूक समस्या सोडवू. नवीन शिक्षण संस्था आणू. चऱ्होली, चिखली भागातील सात बारे वाचवा अशी घोषणा होत आहेत.
महिलांना उमेदवारी देणार पहिला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे
सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की, पिंपरीतील जनता विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. आजतागायत हा विकास झाला नाही. शहरात मला उमेदवारी दिली. महिलांना प्रतिनिधीत्व देणारा पहिला पक्ष राष्ट्रवादी आहे. पिंपरी विधानसभेत ५५ झोपडपट्टीतील नागरिक विकासापासून वंचित आहेत. त्यांचे प्रश्न सोडवून उमेदवारी दिल्याचा विश्वास सार्थ ठरविणार.
सर्व शिवसैनिक प्रामाणिकपणे काम करणार : सचिन अहिर
आम्हाला पिंपरी चिंचवड मधील तीन मतदरसंघापैकी एक तरी मतदारसंघ मिळेल असा विश्वास होता; परंतु तो मिळाला नाही. मात्र जागेच्या वाटपाची ही चर्चा न्हवती तर राज्याच्या अस्मितेची आहे. आम्ही सर्व शिवसैनिक मनापासून उभे आहोत आणि तिन्ही उमेदवार विजयी करू असा विश्वास पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी व्यक्त केला.
विधानसभेचा गड आम्ही सर करूच : रवी लांडगे
लोकसभा निवडणुकीत आम्ही गड सर केला होता. त्याच प्रमाणे आम्ही विधानसभेचा गड आपल्याकडे खेचण्यासाठी आम्ही नक्की यशस्वी होणार आहे. आपण दिलेले जो उमेदवार दिला आहे तो आमदार होणार आहे आणि त्यामाध्यमातून आम्ही ही आमदारच असणार आहोत असा विश्वास शिवसेनेचे युवा नेते रवी लांडगे यांनी व्यक्त केले.
भ्रष्टाचार करणाऱ्यांना गाडा: विलास लांडे
माजी आमदार विलास लांडे म्हणाले, सभा होऊ नये म्हणून विरोधकांनी प्रयत्न केले. परंतु साहेबांचा आशीर्वाद असल्यास काही ही अशक्य नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेत भस्मासुर वाढले आहेत. पिंपरी चिंचवड शहर यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी उभा केले आहे. उद्योग क्षेत्रामुळे शहराचा कायापालट झाला. आजही साहेबांचा आवाका मोठा आहे. घार फिरते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी असे लक्ष आहे पिंपरी चिंचवड वर नेहमीच असते. त्यामुळे सर्वांनी साहेबांच्यावर विश्वास ठेवून शहरातील सर्व उमेदवारांना विजयी करा. विरोधक पैसे वाटू लागले आहेत. त्यांचे पैसे घेवू नका अन्यथा जुलाब लागतील हे लक्षात ठेवा असा टोला विरोधकांवर लगावला.
गद्दाराना गाडण्यासाठी महाविकस आघाडीला साथ द्या : नितेश कराळे
यांनी पक्ष चोराला, चिन्ह पळविले त्यांचा लिलाव आता शरद पवार लावणार आहेत. तुम्हाला निष्ठावंत यांच्याबरोबर राहायचे आहे का गद्दार यांच्या बरोबर हे आत्ता तुम्हीच ठरवा. या गद्दारांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा विडा साहेबांनी उचलला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची चर्चा राज्यभर आहे. येथे भ्रष्टाचार एवढा बोकाळला आहे की कुत्र्याच्या नसबंधित ही हे भ्रष्टाचार करू लागले आहेत. त्यामुळे शरद पवार , उध्दव ठाकरे, राहुल गांधी यांनी दिलेले उमेदवार निवडून द्या , राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचा असेल तर शरद पवार यांना आपण साथ द्याला असा विश्र्वास कराळे मास्टर यांनी यावेळी व्यक्त केला.