वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्यांना त्वरित आर्थिक मदत द्या
- वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
- शेतीचे नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत द्या
- आ. सत्यजित देशमुख यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
लोकमान्य टाइम्स : नागपूर / शिराळा
शिराळा विधानसभा मतदार संघात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बिबट्या, रानगवे, अजगर यांचा समावेश आहे. बिबट्याच्या आणि रानगव्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्यासह शेतीचे जे नुकसान झाले आहे त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या, अशी आग्रही मागणी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली.
ते औचित्याच्या मुद्द्यावर बोलत होते. कापरी (तालुका शिराळा) येथील शेतकरी सर्जेराव मारुती खबाले यांच्यावर दोन दिवसापूर्वी पेठ शिराळा रस्त्यादरम्यान रेठरे धरण हद्दीमध्ये दु चाकीवरुन जात असताना बिबट्याने हल्ला केला. त्यात दुचाकींचा अपघात होऊन ते त्यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देशमुख यांनी अधिवेशनात माहिती दिली. तसेच दोन वर्षांपूर्वी तडवळे येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. वन्यप्राण्यांचे मानवी वस्तीमध्ये येण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतीची कामे करण्यासाठी बाहेर गेल्यास बिबट्याने हल्ला केल्यास काय करायचे ? अशी भीती मतदारसंघातील शेतकरी व इतर नागरिकांच्यामध्ये निर्माण झाल्याने शेतीचे व इतर विभागात ही मोठे नुकसान होत आहे.
त्यात भर म्हणून रानगवे हे शेतीमध्ये मोठे नुकसान करीत आहेत. अनेक ठिकाणी ते थव्याने येत आहेत. त्यांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास ते संबंधीतावर हल्ला करीत आहेत. त्यामध्ये ही मोठ्याप्रमाणावर शेतीचे नुकसान होत असून कधी कधी शेतकऱ्याच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे बिबट्या आणि रानगवे यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांसह जे जखमी झाले आहेत , त्यांना तसेच ज्या शेतीचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी आ. देशमुख यांनी आग्रही पणे मांडली .
तसेच चांदोली कॉलनीमध्ये काही दिवसापूर्वी २१ फुटी अजगर काही वन्य मित्रांनी पकडुन त्याला जंगलात सोडले आहे. त्याअनुषंगाने विविध भागात अजगराची शोध मोहिम राबविण्यात यावी. तसेच गुढे ते बांबरवाडी , खुंदलपूर ते मिरूखवाडी , रिले व परिसरात वन्य प्राण्याच्या त्रास कमी करण्याच्या दृष्टीने संरक्षक भिंत बांधणे, चरी मारणे , रानडुकरांचा त्रास कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांना मारण्याची परवानगी मिळवून देणे, त्यासाठी मुख्य वनरक्षक संरक्षक प्रादेशिक कार्यालय, कोल्हापूर, उपवन रक्षक संरक्षक कार्यालय, सांगली यांना वरिष्ठ स्थरावरून आदेश द्यावेत. अजगराची शोध मोहीम राबवून त्यांना पकडून ते जंगलात सोडावेत अशी मागणी ही आ. देशमुख यांनी यावेळी केली.