मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अपात्र महिलांना मोठा दिलासा
- मिळालेला सन्मान निधी परत घेतला जाणार नाही
- मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिली माहिती
- पाच लाख महिला या योजनेतून अपात्र
लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांना या योजनेंतर्गत मिळणारा लाभ देखील आता बंद होणार आहे. त्यामुळे आजपर्यंत जी रक्कम बँक खात्यात जमा झाली होती, ती रक्कम पुन्हा वसूल करण्यात येणार असल्याच्या चर्चेमुळे अपात्र ठरलेल्या महिलांमध्ये साशंकता निर्माण झाली होती. या चर्चेला महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ट्विट करीत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून कोणतीही रक्कम वसूल केली जाणार नाही असे जाहीर करीत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी !’ असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे. त्यामुळे या महिला जरी अपात्र ठरल्या असल्या तरी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही याबाबत ही तटकरे यांनी ट्विट करीत ‘दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,००० वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,००० कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,००० एकुण अपात्र महिला – ५,००,००० .