बातम्यामहाराष्ट्रराजकीय

संपर्कमंत्री : भाजपचे शिवसेना आणि राष्ट्रवादी पालकमंत्र्यांच्या कारभारावर लक्ष

  • जिथे भाजप चे पालकमंत्री नाहीत तेथे आता संपर्कमंत्री
  • संघटना आणि सरकारमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

विधासभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०२९ च्या निवडणुकीमध्ये शत प्रतीशत भाजपचा नारा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील पदाधिकारी मेळाव्यात व्यक्त केला. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला वाढला आहे. महायुतीत असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथे पालकमंत्री निवडले आहेत तेथे आता भाजप ने संपर्कमंत्री या हत्याराचा वापर करीत संबंधित पालकमंत्री असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर संघटना आणि सरकार यांच्यात समन्वय रहावा या गोंडस नावाखाली पालकमंत्र्यांच्या कारभारावर लक्ष ठेवल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे.

भाजपने संपर्क मंत्री म्हणून पंकजा मुंडे ( बीड), गणेश नाईक ( ठाणे),
अतुल सावे ( संभाजीनगर), चंद्रकांत पाटील ( पुणे), माधुरी मिसाळ ( कोल्हापूर), आशिष शेलार (रत्नागिरी), गिरीश महाजन ( जळगाव),
जयकुमार रावल (नंदुरबार), मंगलप्रभात लोढा ( मुंबई शहर), अशोक उईके (यवतमाळ), जयकुमार गोरे ( धाराशिव), मेघना बोर्डीकर ( हिंगोली),
आकाश फुंडकर (बुलढाणा), पंकज भोयर (गोंदिया), राधाकृष्ण विखे पाटील (वाशीम) यांची निवड केली आहे.

यामध्ये प्रामुख्याने ठाणे, पुणे आणि बीड येथे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीतील घटक पक्षाचे प्रमुख असताना ही त्याठिकाणी संघटना आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्याचा नावाखाली अनुक्रमे गणेश नाईक, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांची निवड करण्यात आल्याने सर्वांच्या भुवय्या उंचविल्या आहेत. अगोदरच पालकमंत्री निवडीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वाद सुरू आहेत. पालकमंत्री बदलासाठी दोन ते तीन जागेवर महायुती अंतर्गत जोरदार वादंग सुरू असतानाच भाजप ने संपर्कमंत्री पदाचा डाव खेळला आहे.

भाजपने संपर्कमंत्री जाहीर करताच शिवसेना ही जिथे शिवसेनेचे पालकमंत्री नाहीत तेथे संपर्कमंत्री नेमणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून कोणती भूमिका आल्याचे दिसत नाही. एकीकडे पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये अंतर्गत शह काटशहाचे सुरू असतानाच आता संपर्कमंत्री पदावरून महायुती अंतर्गत वादाला तोंड फुटणार ..? की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून ही संपर्क प्रमुखांची नावे जाहीर होणार हे पाहणे औचीत्याचे ठरणार आहे.